
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या अभय योजनेअंतर्गत आतापर्यंत ८५५ गाळेधारकांना ५८ लाख ८३ हजार ४५ रुपयांची दंडमाफी देण्यात आली आहे. थकीत भाडे वसुलीसाठी सुरू असलेल्या या मोहिमेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.महापालिकेने थकीत भाडे न भरणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी पथके नियुक्त केली असून, दररोज पाच गाळे सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, १८ आणि २० ऑगस्ट रोजी संबंधित पथकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
१ जुलै २०२६ पासून अभय योजनेअंतर्गत ८५५ गाळेधारकांना दंडातून सवलत देण्यात आली आहे. मिनी शॉपिंग सेंटरमधील ६५३ गाळ्यांपैकी १२३ गाळेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, सुमारे ४२ लाख ८६ हजार रुपयांची थकीत भाडे रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सुमारे १२ लाख रुपयांची दंडमाफी करण्यात आली असून, २१ गाळे सील करण्यात आले आहेत.महापालिकेची थकीत भाडे वसुली मोहीम शनिवार आणि रविवारीही सुरू राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड