
पुणे, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा वाढत्या मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली असून, एस-३० ग्रेड साखरेचा दर ५ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलो झाला आहे.केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुला केला आहे. मात्र, बाजारातील वाढती मागणी लक्षात घेता हा कोटा अपुरा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दरवाढ रोखण्यासाठी अतिरिक्त दोन लाख टन साखरेचा कोटा खुला करण्याची मागणी करण्यात येत आहे.
साखरेच्या निविदांचे दरही वाढले असून, ते क्विंटलमागे ५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मर्यादित पुरवठ्यासोबतच बाजारातील सट्टेबाजांची सक्रियता दरवाढीला चालना देत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील उर्वरित दिवस तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबरनंतर २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळातील साखरेचा पुरवठा आणि दर याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे तुलनेने पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही राज्यांतील कारखान्यांना प्रत्येकी एक लाख टन अतिरिक्त कोटा दिल्यास बाजारातील साखरेचा पुरवठा वाढून दरवाढीला काही प्रमाणात आळा बसू शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु