
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वतःच्या हक्काचे घर असावे या अपेक्षेने अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 39 हजार पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लवकरच टप्प्या टप्प्याने हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी दिली.
प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. गरीब गरजू,आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावातील आणि वाडी वस्तीतील पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठी असून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना लवकरच हक्काचे घर मिळणार आहे.
गेल्या मार्च 2025 पूर्वी त्या त्या गावातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि बेघर कुटुंबाचा ग्रामसेवकांनी सर्व्हे करून शासनाच्या निकषानुसार याद्या तयार करण्यात आल्या. 15 ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित त्या त्या गावातील ग्रामसभेत सदरील लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करून मान्यता देण्यात येत आहे असं सांगून भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, लातूर तालुक्यात 22 हजार 300, रेणापूर तालुक्यात 11 हजार 560 आणि भादा सर्कल मध्ये 5 हजार 26 तर रेणापूर शहरातील 450 याप्रमाणे लातूर ग्रामीण मतदार संघात एकूण 39 हजार 336 लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना ग्रामसभेत मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ग्रामसभेची मान्यता मिळाल्यानंतर शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार यादीतील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगून भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या वर्षी लातूर तालुक्यात 8 हजार 581, रेणापूर तालुक्यात 4 हजार 633, रेणापूर शहरातील 1 हजार 102 आणि भादा सर्कल मधील 3 हजार 352 असे एकूण 17 हजार 668 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले त्यातील अनेकांनी घराचे बांधकाम केले काही जणांची प्रगतीपथावर आहे.
घरकुल पासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. आ. कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण मतदार संघात तब्बल 39 हजार 336 कुटुंबाच्या घराचे स्वप्न साकार होत असून घरकुल मंजूर झाल्यावर निश्चितपणे या पात्र लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहावयास मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis