चंद्रपूर : दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश..पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म
चंद्रपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे एका मातेचा सुरक्षित मातृत्वाचा प्रव
चंद्रपूर : दुर्गम घोडणकप्पीत आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश..पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म


चंद्रपूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

दुर्गम भाग, आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यातील अडचणी आणि जोखमीची गर्भावस्था... अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य विभागाचे कर्मचारी, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे एका मातेचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास सुखरूप पूर्ण झाला. दुर्गम घोडणकप्पी येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांनी 23 ऑगस्ट 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे 3.1 किलो वजनाच्या सुदृढ मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरोदर मातांपर्यंत नियमित आरोग्यसेवा पोहोचविणे हे आरोग्य यंत्रणेसमोरील मोठे आव्हान असते. घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावातही आरोग्य कर्मचाऱ्यांनी इंदिराबाईंच्या गर्भावस्थेच्या सुरुवातीपासून त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले. घरी जाऊन नियमित तपासण्या, रक्तवाढीसाठी आवश्यक इंजेक्शन्स, गोळ्या आणि औषधोपचार देत त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

इंदिराबाईंची ही पाचवी गर्भधारणा असल्याने प्रसूतीदरम्यान संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक दक्षता आवश्यक होती. आई आणि बाळ दोघांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना 10 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोग्य पथकाने त्यांची नियमित देखरेख सुरू ठेवली. पुढील तपासण्यांसाठी 13 ऑगस्ट रोजी त्यांना चंद्रपूर येथे नेण्यात आले. तेथे सोनोग्राफीसह आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आणि डॉ. स्नेहल कासारे यांच्या मार्गदर्शनात हृदयाची ECHO आणि ECG तपासणीही करण्यात आली.

पंधरा दिवसांची काळजी अन् विश्वासाची साथ

गरोदर मातेला जवळपास पंधरा दिवस आरोग्य संस्थेत ठेवणे हे केवळ वैद्यकीय उपचारांपुरते मर्यादित नव्हते. तिची मानसिक तयारी करणे, तिचा विश्वास संपादन करणे आणि प्रत्येक टप्प्यावर आपुलकीने आधार देणे तितकेच महत्त्वाचे होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी संयम आणि संवेदनशीलतेने ही जबाबदारी पार पाडली.

या प्रयत्नांमध्ये इंदिराबाईंच्या कुटुंबीयांची भूमिकाही मोलाची ठरली. त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवत उपचार आणि रुग्णालयातील वास्तव्यासाठी पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे आवश्यक वैद्यकीय देखरेख कोणत्याही खंडाशिवाय सुरू ठेवता आली. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. 23 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे इंदिराबाईंची सुरक्षित प्रसूती झाली. त्यांच्या कुशीत 3.1 किलो वजनाची सुदृढ चिमुकली आली. आई आणि बाळ सुखरूप असल्याचे पाहून कुटुंबीयांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्यावर समाधान उमटले.

ही केवळ प्रसूती नाही, सामूहिक प्रयत्नांचा विजय

इंदिराबाईंची कहाणी ही एका मातेच्या सुरक्षित प्रसूतीपुरती मर्यादित नाही. आरोग्य कर्मचारी, माता, कुटुंब आणि गावकरी यांच्यात विश्वास व समन्वय असेल, तर दुर्गम भागातील आव्हानांवरही मात करता येते, याचे हे उदाहरण आहे.

प्रत्येक गरोदर मातेने वेळेवर तपासणी करून घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करणे आणि जोखीम आढळल्यास प्रसूतीपूर्वीच आरोग्य संस्थेत दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि गावानेही गरोदर मातेला आवश्यक सहकार्य केल्यास माता व बालमृत्यूचा धोका कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.

“आरोग्यसेवा देणारे आणि आरोग्यसेवा घेणारे यांच्यात विश्वास आणि सहकार्याची साखळी मजबूत झाली, तर दुर्गम भागातील प्रत्येक मातेला सुरक्षित मातृत्वाची संधी देता येऊ शकते.” घोडणकप्पी ते पाटण असा इंदिराबाईंचा सुरक्षित मातृत्वाचा प्रवास याच विश्वासाचे प्रतीक ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande