धाराशिवमधील केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा
धाराशिव, 24 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथे
W


धाराशिव, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रत्येक नागरिकाला गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक,सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे,आजारांचे प्रतिबंध व लवकर निदान यावर भर देणे तसेच समुदायाचा आरोग्य व्यवस्थापनातील सक्रिय सहभाग वाढविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबळी, येथे ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या हस्ते करण्यात आला. पर्यावरणपूरक संदेश देत कार्यक्रमस्थळी वृक्षारोपण करून या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.आजपर्यंत जिल्ह्यात सात सत्रे पूर्ण झाली असून,केशेगाव येथे आठवे सत्र संपन्न झाले. दि. २५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,ढोकी येथे नवव्या सत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ईस्माईल मुल्ला,बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीधर जाधव,डॉ.प्रशांत रेवडकर, डॉ.विकांत राठोड तसेच सुहास शिंदे,आरोग्य सहाय्यक निलंकठ मोरे,संजय शिंदे,श्रीमती सुवर्णा सुरवसे व मंजुश्री सुरवसे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

प्रशिक्षणात समग्र व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC), माता व बाल आरोग्य सेवा, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्य शिक्षण,समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन,लवकर निदान,उपचार व आवश्यक संदर्भ सेवा,गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच ‘कस काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या आरोग्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रतिबंधात्मक,प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देण्यात येत आहे.गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे,माता-बाल आरोग्य सुधारणे, लसीकरणाला प्रोत्साहन देणे,पोषण व स्वच्छतेबाबत जनजागृती करणे,तंबाखूमुक्ती व व्यसनमुक्तीला चालना देणे, असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान करणे,संसर्गजन्य आजारांपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे,या बाबींवर विशेष भर देण्यात येत आहे.

या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक,गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका आणि आशा समन्वयक उपस्थित होते. आधुनिक आरोग्य सेवा पद्धती, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण आणि माता-बाल संगोपन यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांद्वारे त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतीमान होईल,असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

‘गावाचा आरोग्य विकास — सर्वांची सामूहिक जबाबदारी!’

‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानातून गावपातळीवर आरोग्यविषयक विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम, जागरूक,निरोगी आणि संपन्न करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

निरोगी गाव → सक्षम कुटुंब → सशक्त समाज → आरोग्यसंपन्न महाराष्ट्र,या संकल्पनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande