
अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)।
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, तर सहा बालके जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने अमरावतीसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर भाजप, अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुर्दैवी घटनेमुळे वातावरण दुःखद असताना जल्लोष करणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका अमरावती भाजपने घेतली आहे. दहीहंडी कार्यक्रमावर होणारा खर्च पीडित कुटुंबीयांना मदतीसाठी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘दहीहंडी कार्यक्रमाऐवजी पीडित कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय संवेदनशील आहे. या दुर्दैवी घटनेतील सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.नवजात बालकांच्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी असून, या घटनेने आपण सर्वच जण दुःखी आणि अस्वस्थ असल्याची भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली. दुःखाच्या या प्रसंगी पीडित कुटुंबीयांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी