
सोलापूर, 03 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांसाठी महत्त्वाचे मानले जाणारे भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलसंपदा विभागाने धरणाच्या आठ स्वयंचलित दरवाजांमधून तसेच विद्युत निर्मिती केंद्रातून मिळून एकूण २,६१५ क्युसेक वेगाने नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
भुतोंडे आणि वेळवंड खोऱ्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. यंदा भाटघर धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दहा ते बारा दिवस आधीच पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण भरण्यापूर्वी जलसंपदा विभागाने रविवारी दुपारी विसर्गाची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर सव्वातीन वाजण्याच्या सुमारास धरण शंभर टक्के भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे उघडून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
शाखा अभियंता गणेश टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या विद्युत निर्मिती केंद्रातून १,६१५ क्युसेक आणि सांडव्यावरील दरवाजांमधून १,००० क्युसेक, असा एकूण २,६१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड