
अमरावती, 3 ऑगस्ट (हिं.स.) : महसूल विभाग हा शासनाचा कणा असून सामान्य नागरिक शासनाचे प्रतिनिधी म्हणून या विभागाकडे पाहतात. त्यामुळे महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून लोकाभिमुख प्रशासन घडवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सेवानिवृत्त अपर आयुक्त सूरज वाघमारे, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहायक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागातील पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नयना गुंडे यांनी महसूल प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकत नागरिकांना जलद आणि संवेदनशील सेवा देण्याचे आवाहन केले.
त्या म्हणाल्या की, सध्या ‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी कालावधीत अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अमरावती विभागात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि बचाव पथकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपत्तीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव
विभागीय आयुक्त कार्यालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
त्यामध्ये:
सूरज वाघमारे – अपर आयुक्त
संतोष आठरे – तहसीलदार
मधुकर धुळे – नायब तहसीलदार
संतोष चव्हाण – निम्नश्रेणी लघुलेखक
उषा गवई – अव्वल कारकून
शशिकांत पाचघरे – महसूल सहायक
संतोष चव्हाण – वाहन चालक
माया राजवाडे – शिपाई
यांचा समावेश आहे. कार्यक्रमात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करण्यात आले.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी