
जळगाव , 03 ऑगस्ट (हिं.स.) प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापूर दरम्यान एकमार्गी विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीमुळे बिहारकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०२०८१ ही विशेष रेल्वे ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता दानापूर येथे पोहोचणार आहे.या विशेष रेल्वेगाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये १२ शयनयान (स्लीपर) आणि ८ सामान्य (जनरल) डबे असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह आरक्षित प्रवाशांचीही सोय करण्यात आली आहे. दरम्यान, या विशेष रेल्वेचे आरक्षण सर्व संगणकीकृत आणि अधिकृत रेल्वे आरक्षण केंद्रांवर तसेच ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर