पंतप्रधान आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात असतानाच निवडणूक आयोगाने आच
संग्रहित


नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात असतानाच निवडणूक आयोगाने आचारसंहिता भंग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यांना 29 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कथित आचारसंहिता उल्लंघनाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप केला होता. आयोगाने 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदावरील लोकांच्या प्रचार भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 77 अंतर्गत 'स्टार कॅम्पेनर'चा दर्जा देणे हे पूर्णपणे राजकीय पक्षांच्या कक्षेत आहे आणि स्टार प्रचारकांनी उच्च दर्जाच्या भाषणात योगदान देणे अपेक्षित आहे.

काही दिवसापूर्वी, राजस्थानमधील बांसवाडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास ते घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये देशाची संपत्ती वाटू शकते. पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसने प्रत्युत्तरात म्हटले की, पंतप्रधानांनी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाकडे या मुद्द्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande