गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
गडचिरोली, 25 एप्रिल (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात आज, गुरुवारी दुपारी 4 वाजता रानटी हत्तीच्या हल्ल्य
संग्रहित छायाचित्र


गडचिरोली, 25 एप्रिल (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात आज, गुरुवारी दुपारी 4 वाजता रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गोंगलू रामा तेलामी असे या शेतकऱ्याचे नाव असून भामरागड परिसरातल्या कियर जंगलात त्याच्यावर हत्तीने हल्ला केला होता.

रानटी हत्तीने सुमारे 2 आठवड्यांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणात प्रवेश केला होता. सीमावर्ती भागात धुडगूस घालत या हत्तीने 2 शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर तो पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परतला. या हत्तीने बल्लाळम येथील घनदाट जंगलात ठाण मांडल्यानंतर 24 एप्रिल रोजी रात्रीपासून आपला मोर्चा कियर जंगलाकडे वळवला. या जंगलाला चिकटून गोंगलू तेलामी यांची जमीन आहे. तेलामी आज, गुरुवारी दुपारी 4 वाजात शेतात काम करत होते. यावेळी रानटी हत्तीने त्यांना सोंडेने उचलून जमिनीवर आदळले व त्यानंतर पायाखाली चिरडले. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचीही मोठी गर्दी झाली होती.

'दक्षिण' गडचिरोलीतील भामरागड, अहेरी तालुक्यात एकच रानटी हत्ती असून त्याने 21 दिवसांत तेलंगणातील दोन व कियरमधील एक अशा 3 शेतकऱ्यांचे बळी घेतले. पिकांसह घरांचेही नुकसान केले. दुसरीकडे 'उत्तर'मध्येही गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, आंबेशिवणी या परिसरात 7 ते 8 रानटी हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. या हत्तींमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande