तिरुअनंतपुरम, 01 ऑगस्ट (हिं.स.) : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील विविध डोंगराळ भागात मंगळवारी झालेल्या भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोक बेपत्ता आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान भूस्खलनग्रस्त भागात एनडीआरएफ आणि सैन्याचे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा आता तीनशेच्या घरात पोहोचला आहे. ताज्या अपडेटनुसार, या दुर्घटनेत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 200 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. एनडीआरएफचे डीजी पीयूष आनंद म्हणाले की, 'एनडीआरएफचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत. आमच्या 4 टीम तेथे उपस्थित आहेत. आम्ही दोरी बचाव तंत्राचा वापर करून लोकांना वाचवले. भारतीय सैन्य आणि हवाई दलही येथे बचावकार्य करीत आहे. भारतीय लष्कर तेथे बेली ब्रिज बांधण्याचा प्रयत्न करत आहे. हवाई दलाने अनेकांची सुटका केली आहे आणि अडकलेल्या लोकांना खाद्यपदार्थांचा पुरवठाही केला आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका वड्रा यांच्यासह वायनाडमधील मेप्पडी सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात पोहोचले. दोन्ही नेत्यांनी भूस्खलनग्रस्तांची भेट घेतली. वायनाडमध्ये 30 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत 280 लोकांचा मृत्यू झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, 'बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी नदीत बचावकार्य सुरूच राहील. सुटका करण्यात आलेल्या लोकांना तात्पुरते शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. पुनर्वसनाचे काम शक्य तितक्या लवकर केले जाईल, जसे आम्ही पूर्वीच्या परिस्थितीत केले आहे. दरम्यान केरळ सरकारने माध्यमांना चित्रिकरण करणे, लोकांच्या मुलाखीत घेणे टाळण्याचा सल्ला दिलाय.
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी