रत्नागिरी : जिल्हा बँक अपहारातील ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा (५०४.३४ ग्रॅम) म्हणजेच १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित शिपाई अमोल
रत्नागिरी : जिल्हा बँक अपहारातील ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत


रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा (५०४.३४ ग्रॅम) म्हणजेच १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात रत्नागिरी शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते याने अपहार केलेले दागिने मुथ्थुट फायनान्स, चिपळूण अर्बन बँक आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीत तारण ठेवून ३५ लाखांचे कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे. बँकेचा शिपाई अमोल मोहिते याने कॅशियर ओंकार कोळवणकर आणि शाखाधिकारी किरण बारये यांच्या संगनमताने नागरिकांनी तारण ठेवलेले दागिने बँकेच्या तिजोरीत न ठेवता परस्पर लांबवले होते. हा अपहार १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत करण्यात आला. प्रकरणाचा उलगडा ऑगस्ट महिन्यात झाल्यानंतर २१ ऑगस्ट २०२५ रोजी तिन्ही संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक केदार वायचळ, पोलिस कॉन्स्टेबल सतीश राजरत्न व इतर कर्मचाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली. चौकशीत मोहितेने अपहार केलेले दागिने चिपळूण अर्बन बँक, मुथ्थुट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स या संस्थांकडे तारण ठेवून कर्ज काढल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही संस्थांना नोटिसा पाठवत दागिने अपहार प्रकरणातील असल्याची माहिती दिली. चिपळूण अर्बन बँकेने आपल्याकडील दागिने त्वरित पोलिसांच्या स्वाधीन केले; परंतु मुथ्थुट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स या कंपन्यांनी दागिने परत करण्यास नकार देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांचा दावा योग्य ठरवत दोन्ही फायनान्स कंपन्यांना दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपहार करण्यात आलेल्या दागिन्यांचे मूळ वजन ५७७.९४ ग्रॅम असून बँकेने कर्ज देताना २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या मापानुसार ५०४.३४ ग्रॅम वजन नोंदवले होते. तक्रार दाखल करताना याच वजनाचा उल्लेख करण्यात आला होता. या कारवाईनंतर जिल्हा बँकेच्या अपहार प्रकरणातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला असून तपासाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande