उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता - मुख्यमंत्री
मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्
मुंबई


मुंबई, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर दक्ष‍िण जोडणी करत 24.35 कि.मी.चा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून दक्षिण किनारी रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू, अटल सेतूचे काम पूर्ण झाले असून आरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईतील प्रवास अखंड होणार असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोडसह आंतर रिंग उभारणे आवश्यक आहे. या रिंग रोडमुळे नाशिक कुंभमेळ्याकरिता सात मार्गाने येणाऱ्या भाविकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या रिंग रस्त्यांची कामे मार्च-जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर नाशिक येथे 66 किमीचा आंतर रिंग रोड उभारण्यास आज मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर या रस्त्यांकरिता आवश्यक लागणाऱ्या भूसंपादनासही मान्यता देण्यात असून यासाठी लागणारा खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत केला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. पुण्यातील मेट्रो सहा कोचच्या करून हे सर्व प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होतील, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिले. पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी या 4.4 किमी लांबीची इलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून हा प्रकल्प जानेवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे.

स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राऊंड मेट्रो मार्च 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी हा कॉरिडोर जुलै 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे मेट्रो लाईन 3 चे लवकर पूर्ण करून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या प्रकल्पासाठी तात्काळ भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

हडपसर - लोणी काळभोर कॉरिडोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करतांना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे नियोजन करण्याचे निर्देश देत मल्टीलेव्हल इंटेग्रेशन करून मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करण्याचेही निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande