अकोला जिल्ह्यात पुन्हा बोंड अळीचे संकट, शेतकरी संकटात
अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)। दिवाळी पर्यंत आलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हयात आता कापसाच्या बोंडांमध्ये गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या सहा महि
अकोला जिल्ह्यात पुन्हा बोंड अळीचे संकट, शेतकरी संकटात


अकोला, 15 डिसेंबर (हिं.स.)। दिवाळी पर्यंत आलेल्या अवकाळी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. जिल्हयात आता कापसाच्या बोंडांमध्ये गुलाबी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. वेळी-वेळी फवारणी, सिंचन, खत खतांची मात्रा देणे अशा सर्व प्रक्रिया नियमितपणे केल्यामुळे कपासाची पीके चांगली वाढलेली दिसत होती. मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात कपासाच्या बोंडांवर गुलाबी अळीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने अकोला जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाले आहेत.

दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या अवकाळी पावसाने सोयाबीनचे पीक अक्षरशः वाहून नेले, आणि ज्या कापसावर शेतकऱ्यांनी शेवटची आशा ठेवली होती. अकोल्यातील दहीगाव गावंडे सह इतर भागात आता बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वर्षभर कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून, फवारण्या, सिंचन, खतांचा भार उचलत शेतकऱ्यांनी पीक वाढवले. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे, कापसावर केलेला खर्च निघेल की, नाही याचीही शाश्वती राहिलेली नाही. सततचे नैसर्गिक संकट, रोगराई आणि वाढते उत्पादनखर्च यांच्या ताणतणावांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. शिवाय कापसाच्या उत्पादनात देखील पन्नास टक्के घट होण्याची भिती देखील व्यक्त करण्यात येत आहे. कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ठोस उपाययोजना का करत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे...

शासनाकडून केवळ कागदोपत्री सूचना आणि अधूनमधून भरपाई होते पण प्रत्यक्षात शेतात काहीच बदल होत नाही. कायमस्वरूपी कीड नियंत्रण उपाय, मजबूत संशोधन, प्रतिरोधक वाण, मोठ्या प्रमाणात मोहीम आणि तंत्रज्ञानाचे अनुदान या योजना आजची गरज आहेत. पण शासनाची पावले मंद आहेत,त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढते आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande