रत्नागिरी, 9 मे, (हिं. स.) : फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ताशी २५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याने आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषी विभागास तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा-काजू पिकाकरिता भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये फळपीक विमा योजनेत आंबा पिकासाठी ३० हजार १३५ शेतकऱ्यांनी व काजू पिकासाठी ६ हजार ३३३ शेतकऱ्यांनी असे एकूण ३६ हजार ४६८ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे. संभाव्य हवामान धोके, महसूल मंडळनिहाय स्थापित केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग, आर्द्रता इत्यादी माहिती स्वयंचलितरीत्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे शासन निर्णयामध्ये निर्धारित केलेल्या कालावधीत हवामान धोके लागू झाल्यानंतर विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लागू होते.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे वातावरण झाले असून वेगाचे वारे २५ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त असल्याने आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कंपनीस किंवा कृषी विभागास तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसानीची तक्रार दाखल न केल्यास फक्त संदर्भ हवामान केंद्रावरील वेगाच्या वाऱ्याची नोंद नुकसानभरपाईसाठी पात्र होणार नाही.
विमा परतावा मिळण्यासाठी आवश्यक असणारी हवामान प्रमाणके अशी - आंबा पीक- वेगाचा वारा - १६ एप्रिल ते १५ मे कालावधीत २५ किमी प्रतितास किवा त्यापेक्षा जास्त (नुकसान झाल्यास ७२ तासात विमा कंपनीस/कृषी विभागास तक्रार करणे आवश्यक), १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग २५ कि.मी प्रतितास राहिल्यास प्रतिहेक्टर २० हजार २६ नुकसानभरपाई देय राहील. १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये कोणत्याही दिवशी वाऱ्याचा वेग प्रतितास २५ किमीपेक्षा जास्त राहिल्यास नुकसानभरपाई ही रक्कम ३४ हजार रुपये इतकी असेल.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी