मच्छिमारांनी केंद्र आणि राज्याच्या सूचनांचे पालन करावे
सिंधुदुर्ग, 9 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात जोरदार लढा देत आहे. भारतीय सैन्य सर्व हल्ले यशस्वीरित्या परतावून लावत आहे. अशा परिस्थितीत सैन्यदलाचे मनोबल खचू नये यासाठीची काळजी आपण सर्वांनी घ्यावी. सैन्याचे मनोबल वाढेल या दृष्टीने तिरंगा रॅली, रक्तदान शिबिर आदी उपक्रम घ्यावेत. त्यासाठी आम्ही सर्व ते सहकार्य करू. तसेच किनारपट्टीसाठी केंद्राच्या विशेष सूचना आणि निर्देश आलेले आहेत. त्याचे पालन सर्वांनी करावे. विशेषत: मच्छिमारांनी समुद्रात अतिउत्साह दाखवू नये. काही संशयास्पद आढळल्यास त्याबाबत लगेच मत्स्य विभागाला कळवावे असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज केले.
कणकवली येथील प्रहार भवन येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही सूचना आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नुकतीच किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत काही नियमावली करण्यात आलेली आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे. नौदलाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत. समुद्रात कुणीही अतिउत्साह करू नये. तुमच्याकडे काही माहिती असेल तर तरी आम्हाला किंवा मत्स्य खात्याला द्यावी असेही श्री.राणे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी