मुंबई, 2 जून (हिं.स.) - एमएमआरडीए, मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसात समन्वय तर ठेवावाच सोबत मुंबई महापालिकेशी ही सतत संपर्क आणि समन्वय ठेवा, कुणीही कुठल्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करा,असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले.
मुंबईतील मान्सून पुर्व कामांच्या आढाव्यासाठी आज एमएमआरडीए कार्यालयात जाऊन पालकमंत्री म्हणून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल, यांच्या सह मुंबई महापालिका आणि संबंधित प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पावसाळ्यापुर्वीच्या केलेल्या कामांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. आपत्कालीन मदत सेवेसाठी 24×7 सेवा देण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. 114 किलोमीटरमधील बॅरिकेट हटविण्यात आले , 19 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहेत. 107 ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत यासह पावसाळ्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.
दरम्यान, मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या, दुर्दैवाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा गाड्यांची गती कमी झाली तर अंधेरी, घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन प्रवाशांना बाहेर काढणे, तसेच अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत एक आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोविडचा आढावा
मेट्रो आणि एमआरडीए बैठकीनंतर त्याच जागी राज्याचे आरोग्य खाते, मुंबई महापालिका आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. सध्या मुंबईतील कोविडची रुग्ण संख्या आणि उपलब्ध सुविधा याचा आढावा घेण्यात आला. कोविडचे रुग्ण दाखल होत असले तरी घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरुपाचे आजार आहेत त्यांनी मास्क वापरण्याची गरज आहे त्यामुळे अशा नागरिकांनी मास्क वापरावे आणि लसीकरण पुन्हा करण्याबाबत तसेच कोविडच्या एकूणच परिस्थितीबाबत केंद्रीय यंत्रणांसोबत बैठका सुरु असून केंद्र सरकारने केलेल्या सूचनांनुसार महापालिका व राज्याची आरोग्य यंत्रणा काम करीत आहे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी