सांगली, 2 जून (हिं.स.)।
येत्या 7 जूनला बकरी ईद सण असून, त्या पार्श्वभूमिवर नियमांचे काटेकोर पालन करून हा सण उत्साहात साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक असून, जनावरांची अवैध कत्तल होणार नाही, याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमिवर आयोजित प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 नुसार राज्यात गाय, वळू व बैलाची कत्तल करण्यास मनाई आहे. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील केवळ अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करून दाखला देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करावी. बकरी ईद हा सण साजरा करताना प्राणी रक्षण कायद्यामधील तरतुदी तसेच प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत स्लॉटर हाऊस अधिनियम अंतर्गत असलेल्या तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. प्राण्यांच्या अवशेषांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावून शहर, गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बकरी ईद सणासाठी जनावरांची वाहतूक होत असताना त्यांच्याकडे प्राधिकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे स्वास्थ्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र असल्याची तपासणी करावी. यासाठी पशुसंवर्धन विभागाने स्थानिक पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, परिवहन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा. जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रत्येक चेक पॉईंटवर जनावरांची वाहतूक नियमाप्रमाणे होत असल्याची तपासणी करावी. त्यातूनही जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सरकारी वकिलांची 6 ते 8 जून या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीत जनावरांची अवैध वाहतूक, कत्तल व पशुधन संरक्षण संबंधित उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने