मुंबई, २ जून (हिं.स.) : बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले याला काल दिल्लीतून अटक करण्यात आली. आज कासलेला मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्याच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे व नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचे आरोप आहेत. यावेळी पोलिस जेव्हा त्याला कोर्टाबाहेर घेऊन जात होते, त्यावेळी कासलेने सरकार विरोधात घोषणाबाजी केली. “इन्कलाब जिंदाबाद”, “महाराष्ट्र सरकार हाय हाय” अशा घोषणा देत त्याने केल्या.
दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांनी रणजित कासले विरोधात तक्रार दिली आहे. तर मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियावर केल्याच्या प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी रणजित कासले विरोधात तक्रार दिली आहे.या दोन्ही तक्रारीवरून रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.
कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात दोन गुन्हे दाखल झाले असून, मुंबईतही एका गुन्ह्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी मिळालेल्या जामीनानंतर त्याने पुन्हा व्हिडीओद्वारे आरोप सुरू केल्याने नव्याने गुन्हे दाखल झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी