चंद्रपूर, 7 जून (हिं.स.)।जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या मोठी असून यादृष्टीने उपाययोजना म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाकरीता विशेषबाब म्हणून विज जोडणी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाला विद्युत जोडणी मिळण्यामध्ये येत असलेल्या अडचणी संदर्भात भाजपा किसान मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बंडू मधुकर गौरकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समस्या अवगत करीत मागणी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कृषी पंपाला विद्युत जोडणी मिळण्याकरिता आवेदन केले असून डिमांडचा भरणा केलेला आहे. परंतु त्यांना अजुनपर्यंत विद्युत जोडणी करुन मिळालेली नाही. ‘बळीराजा कृषी विज माफी योजना’ लागू झाल्यापासून शेतकऱ्यांना कृषी पंप विद्युत जोडणी देणे बंद करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनीची पाण्याची पातळी १५० फुटापर्यंत आहे. त्यामुळे सौरपंप उपयोगी पडणार नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषबाब म्हणून कृषी विज जोडणी करुन देण्याची विनंती निवेदनामार्फत केली आहे. त्याअनुषंगाने याबाबत योग्य कार्यवाहीसाठी संबंधिताना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव