लातूर, 30 जुलै (हिं.स.) - माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त लातूर काँग्रेसच्या वारकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शरद देशमुख महाराज यांनी प्रबोधनाचे ७५ कार्यक्रम घेण्याचा संकल्प केलेला होता. याच संकल्पतून १ ऑगस्टपासून वारकरी विभागातर्फे लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात हभप शरद देशमुख महाराज यांनी १३ दिवसांच्या ज्ञानोबा तुकोबा समता वारकरी दिंडीचे आयोजन केले आहे.
ही दिंडी लातूर ग्रामीण मतदारसंघातील ५१ गावातून जाणार असून या दिंडीचे १२ ठिकाणी मुक्काम असणार आहेत. या दिंडीची सुरुवात १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मळवटी या गावातून होणार असून याचा समारोप १३ ऑगस्ट रोजी बाभळगाव येथे होणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून १३ दिवस किर्तन, प्रवचन, भजन हरीनामाचा गजर, तसेच संवाद बैठका होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या वारकरी विभागाचे जिल्हाध्यक्ष हभप शरद देशमुख महाराज यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis