परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळात ढगफुटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करपरा नदी काठची शेती खरडून गेली असून, शेतातील हळद, कापूस, तुर, सोयाबीन ही पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांची शेतीतील अवजारे वाहून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतीसोबतच जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असून, अनेक जनावरे वाहून गेली आहेत. काही ठिकाणी राहती घरे कोसळल्याचीही माहिती समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे निवेदन सादर केले. यात तातडीने पंचनामे करून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis