रत्नागिरी, 18 सप्टेंबर, (हिं. स.) : देवरूख-साखरपा मार्गावर काल रात्री उशिरा एका व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रसिद्ध केतकर ज्वेलर्स यांच्यावर हा दरोडा टाकण्यात आला. मोर्डे खिंडीजवळ त्यांचा ताबा घेत अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे अपहरण केले, त्यांना लुटले आणि त्यानंतर वाटूळजवळ सोडून पोबारा केला. केतकर ज्वेलर्सचे मालक साखरप्यातून देवरूखला परत येत असताना, मोर्डे खिंडीच्या निर्जन परिसरात काही अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर, त्यांना धमकावून त्यांचे अपहरण केले. दरोडेखोरांनी त्यांना लुटून त्यांच्याकडील ऐवज घेऊन पळ काढला. त्यानंतर, त्यांनी केतकर यांना वाटूळच्या दरम्यान सोडून दिले.
केतकर यांनी तत्काळ देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने नाकेबंदी सुरू केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी