मुंबई, 3 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता. प्रत्येक गावातून “एक शिदोरी आंदोलकांसाठी” या भावनेतून नागरिकांनी मदतीचा ओघ सुरू केला. त्यामुळे तीन दिवसांत तब्बल दहा लाख भाकऱ्या, चटणी, ठेचा, लोणचे, भाजी, पाणी व इतर साहित्य जमा झाले. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात चार ठिकाणी या भाकऱ्या व अन्य साहित्याचा प्रचंड साठा करण्यात आला होता. आलेले अन्न लगेच आंदोलकांना पुरवले जात होते; मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मदत आल्यानंतर अखेर समाजातर्फे “आता मदत थांबवा” असे आवाहन करावे लागले.
मंगळवारी संध्याकाळी आंदोलनाची सांगता झाल्यानंतर या उरलेल्या भाकऱ्या, पाण्याच्या बाटल्या, चटणी, ठेचा, लोणचे यासह इतर अन्नपदार्थ वाया जाऊ नयेत म्हणून मराठा आंदोलकांनी ते गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी या अन्नसाहित्याचे वर्गीकरण करून वितरणाची व्यवस्था केली. उरलेले अन्न व पाणी सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय तसेच विविध अनाथाश्रमांमध्ये पोहोचवण्यात आले. त्यामुळे आंदोलनादरम्यान लोकांनी केलेली मोठी मदत फुकट न जाता योग्य ठिकाणी पोहोचली.
गावागावांतून सामान्य नागरिकांनी कुवतीप्रमाणे वर्गणी काढून ही मदत मुंबईत पाठवली होती. भाकरी, पोळी, चिवडा, फरसाण, खर्डा, ठेचा, लोणचे, पाण्याच्या बाटल्या अशा विविध साहित्याने सिडको प्रदर्शन केंद्र अक्षरशः गजबजून गेले होते. संपूर्ण शहराला जेवण देता येईल एवढा साठा झाल्याने आंदोलनकर्त्यांनी मदत थांबवण्याचे आवाहन केले होते. तरीही या अन्नदानातून एक वेगळाच सामाजिक संदेश देण्यात आला. आंदोलनानंतरही “अन्न वाया घालवायचं नाही, तर गरजूंना द्यायचं” अशी भूमिका मराठा समाजाने घेतल्याने समाजातील ऐक्य व संवेदनशीलता पुन्हा अधोरेखित झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule