
- मार्च २०२६ पर्यंत पाणीपुरवठा सुरू होण्याचे नियोजन
पालघर, 14 जानेवारी (हिं.स.)।
जल जीवन मिशन अंतर्गत डहाणू तालुक्यातील मौजे सुकडआंबा येथील नवीन पाणी पुरवठा योजनेच्या शिरसोनपाडा येथील उंच साठवण टाकीच्या टॉप स्लॅब लगत लँडिंग स्लॅब कोसळून २ शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला होता. या दुर्घटनेनंतर प्राप्त स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टनुसार सदर योजनेतील समाविष्ट तिन्ही टाक्या पाडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्फत ३ जुलै २०२५ रोजी कंत्राटदारास देण्यात आले होते.
त्यानुसार डिसेंबर २०२५ रोजी तिन्ही टाक्या कंत्राटदारामार्फत पूर्णपणे पाडण्यात आल्या. त्यानंतर कंत्राटदाराने आदेशाचे पालन करून नवीन टाक्या बांधण्याचे काम सुरू केले आहे. सध्या पाटिलपाडा, जुनुनपाडा व शिरसोनपाडा येथील उंच पाणी साठवण टाक्यांचे काम सुरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार हे काम सुरू असून, सदरील टाक्यांचे काम पूर्ण करून सुकडआंबा योजनेतून मार्च २०२६ पर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे गावातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल.
ही योजना आदिवासी बहुल भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला असून स्थानिकांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL