रत्नागिरी : डॉ. नंदकुमार तावडे यांचे निधन
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे (वय ७८) यांचे गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले. डॉ. तावडे यांनी १९६६ साली दापोलीच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घ
डॉ नंदकुमार तावडे


रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नंदकुमार तावडे (वय ७८) यांचे गिम्हवणे येथील राहत्या घरी निधन झाले.

डॉ. तावडे यांनी १९६६ साली दापोलीच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. बीएस्सी (कृषी) पदवी प्राप्त केल्यानंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी विस्तार या विषयात एमएस्सी पदवी संपादन केली. काही काळ राज्य शासनाच्या सांख्यिकी विभागात काम केल्यावर दापोलीच्या कृषी महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर त्यांची नियुक्ती झाली. सेवेत असतानाच त्यांना पीएचडी शिक्षणासाठी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. तेथे त्यांनी संशोधन केले आणि पीएचडी प्राप्त केली.

डॉ. तावडे यांनी कृषी विस्तार विषयाचे सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विभागप्रमुख या पदांवर काम करताना आपली वेगळी कार्यशैली निर्माण केली. अध्यापन, संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. याशिवाय, महाविद्यालयाच्या सहशैक्षणिक उपक्रमांमध्येदेखील त्यांचे मोठे योगदान होते. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना पथकांचे नेतृत्व त्यांनी केले.

डॉ. तावडे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे आणि शास्त्रीय नियतकालिकांचे सदस्य व पदाधिकारी होते. देशातील अनेक कृषी विद्यापीठांतील कृषी विस्तार विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या, तसेच पीएचडी प्रबंधांचे मूल्यमापन त्यांनी केले. याशिवाय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका काढण्यासाठी आणि उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्यांना निमंत्रित केले जायचे.

डॉ. तावडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी मार्गदर्शन केले. शास्त्रीय व कृषीविषयक नियतकालिके आणि वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले. कृषी महाविद्यालय आणि कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विद्यार्थी परिषद, अभ्यास मंडळे, विद्याशाखा, विद्या परिषद आणि कार्यकारी परिषदेचे सदस्य व पदाधिकारी म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, बंधू, वहिनी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande