
जळगाव , 19 जानेवारी (हिं.स.) प्रवाशांची वाढणारी गर्दी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासाची गरज लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पश्चिम मध्य रेल्वेवर धावणारी जबलपूर-कोइम्बतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल रेल्वे पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे जळगाव आणि भुसावळातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाच्या नव्या निर्णयानुसार गाडी क्रमांक 02198 जबलपूर-कोइम्बतूर ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 6 मार्च 2026 ते 27 डिसेंबर 2030 या कालावधीत धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 02197 कोइम्बतूर-जबलपूर ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 9 मार्च 2026 ते 30 डिसेंबर 2030 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षे ही ट्रेन नियमितपणे धावत राहणार असून विशेष म्हणजे या ट्रेनच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये, धावण्याच्या दिवसांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.दरम्यान रेल्वेच्या या निर्णयामुळे जळगाव भुसावळातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. विशेष भुसावळमार्गे कोकण आणि गोवा जाण्यासाठी या गाडीचा फायदा होणार आहे
या ट्रेनचे प्रमुख थांबे नरसिंगपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासारगोड, कोझिकोड, शोरनूर आणि पालघाट अशा महत्त्वाच्या स्थानकांवर असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर