
रायगड, 29 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या ७ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण होताच जिल्ह्यातील राजकारणात एक बाब ठळकपणे समोर आली आहे, ती म्हणजे घराणेशाहीचा वाढता प्रभाव. शिवसेना, भाजपसह प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना आपल्या कुटुंबातील सदस्यांनाच प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी तसेच १५ पंचायत समिती अंतर्गत ११८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून तब्बल ५०२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच अधिक संधी दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अलिबाग तालुक्यातून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्नी मानसी दळवी आणि सून आदिती दळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपकडून माजी आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी भावना पाटील आणि मुलगा सुप्रभात पाटील उर्फ सवाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच कुटुंबातील चित्रा पाटील यांनाही भाजपकडून संधी मिळाली आहे.
महाडमध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले निवडणूक लढवत आहेत. कर्जत येथून आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. पेणमध्ये आमदार रविंद्र पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील, तर शर्मिला, पाली आणि जांभुळपाडा मतदारसंघातून खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलीमा पाटील या देखील निवडणूक रिंगणात आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे विकासाच्या मुद्द्यांपेक्षा घराणेशाहीच्या राजकारणाचीच लढत ठरत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली असून, मतदार या प्रवृत्तीला ७ जानेवारीला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके