
मुंबई, 29 जानेवारी, (हिं.स.)। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने शासकीय कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने एक कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी उपस्थितांच्या वतीने यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ.इकबालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिम कुमार गुप्ता, विकासचंद्र रस्तोगी, वेणुगोपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, एकनाथ डवले, सौरभ विजय, डॉ.हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस.चोक्कलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संतोष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भोज, अंशु सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात येऊन त्यांना हे दु:ख सहन करण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी मंत्रालयातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर