
रायगड, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार, राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवड प्रक्रिया २० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यातही पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी भेट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत उदय सामंत यांच्या हालचालींवरही चर्चा रंगली आहे.
युतीधर्म पाळत शिंदे गटाला सत्तेत स्थान देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव असल्याचेही बोलले जात आहे. रायगड जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी भाजपकडून वैकुंठ पाटील यांचे नाव चर्चेत असून उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अंतिम निर्णयासाठी वाटाघाटी निर्णायक ठरणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ नुसार, पहिल्याच बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बंधनकारक आहे आणि निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळही पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर २० मार्चपूर्वी बैठका घेण्याची जबाबदारी आहे.
स्पष्ट बहुमत नसलेल्या जिल्ह्यांमध्ये अपक्ष सदस्यांचे महत्त्व वाढले असून, संभाव्य आघाड्या, क्रॉस व्होटिंग आणि गटबाजीमुळे राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे. राज्याचे लक्ष आता २० मार्चपूर्वी कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे लागले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके