
रत्नागिरी, 28 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी यांच्या शिमगा उत्सवाला अवघे काही दिवस उरले असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात तयारीला वेग आला आहे. भैरी देवाची पालखी व धुळवड ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावरील विद्युत दिव्यांची पाहणी नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी प्रत्यक्ष फिरून केली.
पालखी मार्गावरील सर्व पोलवरील लाइट सुरू आहेत की नाही, याची खात्री करताना काही ठिकाणी दिवे बंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याच्या सक्त सूचना नगराध्यक्षांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी नगरसेवक अभी दुडे, श्री. प्रशांत सुर्वे तसेच युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उत्सव निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी