
रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : कोट (ता. लांजा) येथील गावचे शेतकरी उदय खेर यांनी विकसित केलेले ओला काजू अखंड सोलण्याचे मशीन कोकणातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
या मशीनची संकल्पना उदय खेर यांनी २०१९ साली प्रत्यक्षात आणली. औपचारिक अभियांत्रिकी शिक्षण नसतानाही, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी विविध प्रयोगांतून हे यंत्र विकसित केले. मात्र आर्थिक मर्यादा व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे उत्पादन व बाजारपेठेपर्यंत पोहोचणे त्यांना शक्य झाले नव्हते. मात्र त्यांनी आता विकसित केलेले मशीन काजू उत्पादक व प्रक्रिया उद्योगासाठी वेळ, श्रम व नुकसान कमी करणारे ठरण्याची शक्यता आहे. भविष्यात अशा स्थानिक नवकल्पनांना अधिक पाठबळ मिळावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
ओल्या काजूगराला बाजारात मोठी मागणी असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी ओले काजूगर सोलण्याचा प्रयत्न करतात. मात्र ओला काजूगर सोलणे अत्यंत त्रासदायक आहे. पुरेशी काळजी घेतली नाही, तर त्यामुळे हातांना इजा होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन श्री. खेर यांनी हे यंत्र विकसित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी