
जळगाव, 14 मार्च (हिं.स.)उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सोय व्हावी यासाठी तब्बल १४८४ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या बडनेरा–नाशिक रोड विशेष गाड्यांचाही समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे मेमू, मेल, एक्सप्रेस तसेच सुपरफास्ट गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे जळगाव आणि भुसावळ येथील प्रवाशांना अनेकदा जागा मिळणे कठीण होत आहे. काही वेळा गाड्या उशिरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे जळगाव आणि भुसावळ येथील प्रवाशांना प्रवासासाठी अतिरिक्त गाड्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची संधी प्रवाशांना मिळणार आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या सेवांमध्ये ७४९ आरक्षित तर ७३५ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
सुट्ट्यांच्या काळात वाढणारी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन काही मार्गांवर विशेष गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहेत. तसेच अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी काही नवीन विशेष गाड्याही सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्यातील इतर महत्त्वाच्या मार्गांवरही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई/दौंड–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, नाशिक रोड–बडनेरा तसेच हडपसर–हरंगुळ या मार्गांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर