
मुंबई, 14 मार्च (हिं.स.)न्यूझीलंडला पराभूत करत टीम इंडियाने नुकताच सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने किवींना ९६ धावांनी मात देत विजेतेपद पटकावले होते. शनिवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला ट्रॉफीसह भेट दिली आणि प्रार्थना केली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप जिंकला. यासह, भारत घरच्या मैदानावर टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश बनला. भारतीय संघ टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद कायम राखणारा जगातील पहिला संघही बनला आहे.दरम्यान, भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच वर्षे पूर्ण केली आहेत. सूर्यकुमारने १४ मार्च २०२१ रोजी इंग्लंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताने अलीकडेच सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला. सूर्यकुमारने त्याच्या प्रवासातील एका क्षणाची आठवण करून देणारा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला.
तत्पूर्वी, मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यासह ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच अहमदाबादमधील हनुमान मंदिराला भेट दिली होती. सर्व सदस्यांनी मंदिरात आशीर्वाद घेतले, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे