
बीड, 18 मार्च (हिं.स.)।
चैत्रवारी निमित्त आवसगाव (ता. केज) येथून मानाच्या ध्वजाची पायी ध्वजदिंडीने शिखर शिंगणापूरकडे भक्तिभावात प्रस्थान केले. अनेक वर्षांची ही धार्मिक परंपरा असून यंदाही लहान-थोर, महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
कै. संभाजी महाराज ध्वजकरी यांनी सुरू केलेली ही पायी ध्वजदिंडी असून त्यांच्या पश्चात धर्मराज महाराज ताठे हे सेवेकरी म्हणून कार्य पाहत आहेत. तर महादेव शिनगारे, सुधाकर शेळके व अशोक शिंदे यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. यात्रेदरम्यान भाविक 'हर हर महादेव, शंभो पार्वती पते, शिव हर हर महादेव' अशा जयघोषात तसेच ढोल-ताशांच्या निनादात शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करत आहेत.
ही पायी दिंडी कळंब, बार्शी, कुडूवाडी,
टेंभुर्णी, बावडा, नातेपुते मार्गे शिखर शिंगणापूर येथे पोहोचणार आहे.
गुरुवार दि. २६ मार्च रोजी यात्रेनिमित्त शिखर शिंगणापूर येथे सायंकाळी महादेव मंदिर शिखर ते बळी मंदिर शिखर या दरम्यान मानाच्या ध्वज बांधणीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis