
मुंबई, 25 मार्च, (हिं.स.)। ३१ डिसेंबर १९९३ रोजी देवेंद्र पेम लिखित दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला. आज तेहत्तीस वर्षानंतरही २०२६ साली सुद्धा नाटकाचे प्रयोग देवेंद्र पेम यांच्या अनामय प्रॉडक्शन्स या संस्थेतर्फे अविरत सुरू आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या नाटकाच्या पहिल्या टीमने रसिक प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. भरत, अंकुश, संजय हे तिघेही गुणी कलाकार सुपरस्टार झाले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, दिपा परब ही दुसरी टीम होती तेही सुपरस्टार झाले. त्यानंतर नाटकाच्या जवळपास २५ टीम्स झाल्या. ५००० प्रयोगांच्या जवळ पोहोचलेल्या ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
तीच जादू नाटकाची नवीन टीम निखिल चव्हाण जुई बेंडखळे मयुरेश पेम आणि मनमित पेम करत आहेत. ‘ऑल दि बेस्ट’ च्या या नवीन टीमवर सुद्धा रसिक प्रेक्षकांनी खूप प्रेम करत आहेत. म्हणुनच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे जोरदार हाउसफुल्ल प्रयोग सुरू असून लंडन दुबई येथे सुद्धा हाऊसफुल्ल परदेश दौरे या टीमने केले आहेत. आता लवकरच ही नवीन टीम अवघ्या २ वर्षात ३०० प्रयोगांचा टप्पा पार करत आहे. ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा ३०० वा प्रयोग रविवार १२ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे धुमधडाक्यात संपन्न होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर