
मुंबई, २९ मार्च (हिं.स.) : मध्य रेल्वे ३० मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ऐतिहासिक 'पंजाब मेल' (ट्रेन क्रमांक 12137/12138) च्या 'ट्रेन महोत्सवा'चे आयोजन करत असल्याची घोषणा अभिमानाने करत आहे.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी सुटण्याच्या एक तास आधी, म्हणजेच १८:३५ वाजता, उत्सवाला सुरुवात होईल. या गाडीला वारसा-आधारित नक्षीकाम आणि दृश्यांनी सुशोभित करण्यात येईल; जे तिचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करेल. हा सोहळा 'पंजाब मेल'च्या प्रवासाचा वेध घेईल, जी भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे.
*आधुनिकीकरणाची कामे*
'ट्रेन महोत्सव' उपक्रमाचा एक भाग म्हणून, 'पंजाब मेल'ची ऐतिहासिक मोहिनी अबाधित राखतच, प्रवाशांचा आराम व सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने या गाडीचे महत्त्वपूर्ण नूतनीकरण करण्यात आले आहे:
*आतील भाग (प्रथम वातानुकूलित):* उत्तम सौंदर्यासाठी कूपै आणि आयल पॅनेलवर विनाइल रॅपिंग.
*बाहेरील ब्रँडिंग:* प्रथम वातानुकूलित-द्वितीय वातानुकूलित संयुक्त कोच आणि पॅन्ट्री कारवर वारसा-थीम असलेल्या चित्रांसह विनाइल रॅपिंग.
*सांस्कृतिक एकात्मता:* पंजाब मेलचा १९१२ चा वारसा, महाराष्ट्र-पंजाब संबंध आणि स्वातंत्र्य लढ्याशी असलेला संबंध दर्शवणारी रचना; ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया आणि सुवर्ण मंदिराचे स्क्रीन प्रिंट्स आहेत.
*वारसा प्रतिमा (हेरिटेज इमेज):* वातानुकूलित कोचच्या आत वॉटरप्रूफ कॅनव्हास प्रिंट्स, ज्यामुळे संग्रहालयासारखा अनुभव मिळतो.
*प्रवाशांची सोय:* सर्व वातानुकूलित कोचमध्ये नवीन पडदे पुरवले आहेत.
*स्वच्छतेतील सुधारणा:* ऑटो एअर फ्रेशनर्स, सीट कव्हर डिस्पेंसर, सुधारित बिब कॉक, सोप डिस्पेंसर, पीव्हीसी फ्लोअरिंगची दुरुस्ती आणि स्क्रॅपर मॅट्सची तरतूद.
*सामायिक जागा:* अधिक टिकाऊपणासाठी गँगवे, दरवाजे आणि शौचालयांमध्ये विनाइल रॅपिंग.
*फलक:* सर्व कोचमध्ये एकसमानता आणण्यासाठी वारसा-थीम असलेले फलक.
फायनल टच: अधिक सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्जवर रंगाचा फायनल टच-अप करण्यात आला.
ऐतिहासिक वारसा
पंजाब मेल, जी मूळतः पंजाब लिमिटेड म्हणून ओळखली जात होती, ही भारतीय रेल्वेच्या सर्वात जुन्या गाड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे, ती प्रसिद्ध फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांहून अधिक जुनी आहे.
बॅलार्ड पिअर मोल स्टेशन एकेकाळी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपीआर) सेवांसाठी एक प्रमुख केंद्र होते, जिथून पंजाब मेलचा प्रवास सुरू होत असे. दि. १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल येथून या गाडीने आपला पहिला प्रवास सुरू केला. अनेक दशकांपासून, प्रचंड ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला हा प्रवास मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा राहिला आहे.
वारसा महत्त्व
'पंजाब मेल' ही केवळ एक रेल्वेगाडी नाही; तर तो एक जिवंत वारसा आहे, ज्याने पिढ्यानपिढ्या विविध प्रदेश, लोक आणि इतिहास यांना परस्परांशी जोडले आहे. आपल्या खोलवर रुजलेल्या वारशासह आणि सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणामुळे, परंपरा आणि आधुनिक प्रवासी सुविधा यांचा सुरेख मेळ घालण्याच्या 'मध्य रेल्वे'च्या कटिबद्धतेचे ती एक प्रतीक म्हणून उभी आहे.
मध्य रेल्वे प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेला वारसा, जुन्या आठवणी आणि प्रगती यांच्या या उत्सवाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी