
लातूर, 04 मार्च (हिं.स.)। अहमदपूर तालुक्यात ७ मार्चपासून ‘महाराजस्व समाधान शिबिरांचे’ आयोजन; एकाच छताखाली सुटणार सर्वसामान्यांचे प्रश्न
अहमदपूर तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच निर्गमित झाला असून, अहमदपूर तहसील प्रशासनाने तालुक्यातील विविध महसूल मंडळांनुसार शिबिरांचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
या अभियानांतर्गत महसूल विभाग, भूमी अभिलेख, कृषी, आरोग्य, पंचायत समिती आणि नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित सर्व कामे 'एक खिडकी' योजनेद्वारे पूर्ण केली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना विविध दाखले मिळवणे आणि सातबारा दुरुस्ती यांसारखी कामे प्राधान्याने करून घेता येणार आहेत.प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या शिबिरांची सुरुवात ७ मार्च २०२६ रोजी किनगांव महसूल मंडळातून होणार आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी हाडोळती, १० एप्रिल रोजी शिरूर ताजबंद, १७ एप्रिल रोजी अंधोरी, २४ एप्रिल रोजी खंडाळी आणि शेवटच्या टप्प्यात ८ मे २०२६ रोजी अहमदपूर नगर परिषद स्तरावर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनहिताय सर्वदा हे ब्रीदवाक्य समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अर्जांची संख्या आणि निकाली काढलेल्या प्रकरणांचा अहवाल थेट शासनास सादर केला जाणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या नजीकच्या मंडळाच्या ठिकाणी दिलेल्या तारखेला उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अभिलाष जगताप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis