
जळगाव , 13 एप्रिल (हिं.स.)शहरातील वेगवेगळ्या भागातून चार महिला आणि एका दोन वर्षांच्या चिमुरडीसह एकूण पाच जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी आणि शनिपेठ पोलिस ठाण्यांत हरवल्याच्या नोंदी करण्यात आल्या असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत. ललिता अनिल भील (वय २८, रा. चहार्डी, ता. चोपडा) या ममुराबाद येथे नातलगांकडे आल्या होत्या. २८ मार्चच्या रात्री त्या कोणालाही न सांगता निघून गेल्या. त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाची फुलांची साडी होती. ममता कैलास पाटील (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी) या ७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर परतल्या नाहीत. तसेच कीर्ती खंडू थारे (वय १८ वर्षे १० महिने, रा. शिरसोली) या ७ एप्रिलच्या रात्री १० ते ८ एप्रिलच्या सकाळी ५ वाजेच्या दरम्यान बेपत्ता झाल्या. दरम्यान, शनिपेठ पोलिस ठाणे हद्दीत प्रेरणा राजेश भालेराव (वय १८ वर्षे २ दिवस) या आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह बेपत्ता झाल्या आहेत. त्या आंबेडकरनगर भागात सासूसोबत राहत होत्या. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सासू घरी आल्यानंतर दोघीही घरात नसल्याचे आढळले.या सर्व प्रकरणांमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर