
पुणे, 17 एप्रिल, (हिं.स.)।
अक्षय्य तृतीयेला आंबा खाण्याची आणि देवाला नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. प्रथमच आतापर्यंतच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले आहे.
यंदाच्या अक्षय्य तृतीयेला आंबा महाग झाला आहे. सध्या ८०० ते १५०० रुपये डझन या दराने हापूस आंब्यांची विक्री होत आहे. अक्षय्य तृतीयेमुळे घाऊक बाजारात कच्च्या आंब्याची आवक होत आहे. मात्र तयार आंब्याचे प्रमाण कमी असल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्यांनी भाव खाल्ला आहे.
मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक फळ बाजारात दर वर्षी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. त्यामुळे दर कमी होतात. मात्र, यंदा कोकणातील हापूस आंब्यांवर वातावरणातील बदलांचा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादन कमी झाले असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ५० टक्क्यांनी आवक कमी झाल्याने आंब्याचे भाव वाढले असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु