
कोल्हापूर, 17 एप्रिल (हिं.स.)। लव जिहाद आणि धर्मांतरणविरोधात कठोर कायदे करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निवेदने देण्यात आली.
कोल्हापुरात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शांतीभाई लिंबाणी आणि जिल्हा मंत्री विनय बारड यांनी केले. यावेळी सहमंत्री रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष कृष्णात गुंडूकुपे, जान्हवी पाटील, निलेश शिंदे, सागर माथे, मुकेश दयामा, शिवाजी गुरव तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी साळुंखे, डॉ. अश्विनी माळकर, शिवानंद स्वामी, गजानन तोडकर आदींसह बजरंग दल व दुर्गा वाहिनीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान जिल्हा मंत्री विनय बारड यांनी सांगितले की, “कोल्हापूरच्या ग्रामीण भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.” तर जिल्हाध्यक्ष शांतीभाई लिंबाणी यांनी राज्य व देशपातळीवर हा प्रकार वाढत असल्याचा आरोप करत कठोर कायद्यांची मागणी केली.
जान्हवी पाटील आणि डॉ. अश्विनी माळकर यांनी “या प्रकारामागे संघटित स्वरूप असल्याचा आरोप करत त्याला आळा घालण्यासाठी कडक कायदे गरजेचे आहेत,” असे मत व्यक्त केले.आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar