
परभणी, 17 एप्रिल (हिं.स.)।
खरीप 2025 च्या पिक विम्यातून काही महसूल मंडळे वगळल्याच्या निषेधार्थ सेलूतील शेतकर्यांनी संताप व्यक्त करत कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जयसिंग शेळके, दगडोबा जोगदंड महाराज, शिवहरी शेवाळे, विजय काष्टे, उद्धवराव मोरे, महेश नावडे, गोपीनाथ सोळंके, कंस मानमोडे आदींसह अनेक शेतकरी बांधवांनी आज शुक्रवार 17 एप्रिल रोजी सेलूच्या तालुका कृषी अधिकार्यांना या विषयाच्या अनुषंगाने एक निवेदन सादर केले. त्याद्वारे, तालुक्यातील कुपटा, मोरेगाव, चिकलठाणा आणि वालूर या महसूल मंडळांचा खरीप 2025 पिक विमा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, 2025 मध्ये या परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी व अतिवृष्टी झाली होती. दूधना, कसूरा नद्या तसेच करपरा नाल्यालगतच्या शेतांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतांची जमीनही खरडून गेली आहे. अशा परिस्थितीतही संबंधित मंडळांना पिक विम्यातून वगळण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कापणी प्रयोगाच्या संयुक्त अहवालात गटविकास अधिकारी, महसूल विभाग, कृषी विभाग व विमा प्रतिनिधी यांच्या स्तरावर झालेल्या त्रुटींमुळे शेतकर्यांना विमा लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
संबंधित मंडळांचा तातडीने पिक विमा योजनेत समावेश करून सर्व शेतकर्यांना लाभ द्यावा, अन्यथा 27 एप्रिल पासून कृषी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकर्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis