
रायगड, 21 एप्रिल, (हिं.स.) : अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल बंद्यांमध्ये नैतिक मुल्यांचा विकास आणि हिंसामुक्त समाज घडविण्यासाठी मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने कारागृहातील बंद्यांकरीता आयोजित करण्यात आलेल्या गांधी शांती परिक्षेत जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी दिली आहे.
संस्थेचे स्वयंसेवक प्रेमशंकर तिवारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शांततापूर्ण जगाची निर्मिती करण्यासाठी तसेच भावी पिढीसाठी बंद्यांमध्ये प्रेम, बंधुत्व, मैत्रीभाव, सहिष्णुता, सेवाभाव, सत्य, अहिंसा आणि शांततेचे बिज रुजवुन शांतिमय जिवन जगण्याकरीता बंद्यांना प्रवृत्त करण्यासाठी गांधी शांती परिक्षेचे आयोजन करीत असल्याचे सांगितले. तसेच महात्मा गांधीजींची आत्मकथा वाचून बंद्यांचे हृदय परिवर्तन व्हावे, त्यांना भावी जीवन जगण्याची प्रेरणा मिळावी व बंद्यांनी सत्य व अहिंसेच्या मार्गावर जावून त्यांचे विचार परिवर्तन होण्यास मदत करण्याच्या उद्देशाने या संस्थेमार्फत कारागृह ग्रंथालयात बंद्यांना वाचण्याकरीता गांधी विचारांची पुस्तके देण्यात आली आहेत.
तसेच गांधी शांती परिक्षेत अलिबाग जिल्हा कारागृहातील 23 महिला व पुरुष बंद्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बंद्यांना मुंबई सर्वोदय मंडळ यांच्यावतीने खादीचे टॉवेल, हातरुमाल व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.सुहास वारके व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी , प्रेमशंकर तिवारी व श्रीम. सुनिता पटेल (स्वयंसेवक) मुंबई सर्वोदय मंडळ, मुंबई तसेच देवलु रांजड (सुभेदार), श्रीम. रामेश्वरी ढाळगे, श्रीम. भारती शेवाळे (महिला शिपाई), सतिष जुंबळे, महाविर जगताप, गजानन खवळे (का. शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)