
जळगाव, 21 एप्रिल (हिं.स.) । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा येथील प्रदीप महाजन (माळी) हत्याकांडाचा छडा लावला आहे. मुंबईहून जळगावकडे येणाऱ्या धावत्या रेल्वेत पोलिसांनी सापळा रचून दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा घडल्यापासून अवघ्या २४ तासांत पोलिसांनी हा तपास पूर्ण करत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.
चोपड्यातील तारामती नगरमधील रहिवासी प्रदीप राजेंद्र महाजन-माळी (वय ३३) यांची १९ एप्रिलच्या रात्री अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा चेहरा आणि डोके दगडाने ठेचून मृतदेह चोपडा शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ फेकून देण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे यास अटक करण्यात आली होती. संशयीत आरोपी चेतन कानडे याच्या सांगण्यावरून विजय भास्कर वैदकर, (रा. भाग्योदय नगर, चोपडा) आणि निर्मल संजय बडगुजर (रा.चिंचचौक, चोपडा) यांनी संगनमताने प्रदिप महाजन यांचा पूर्व वैमनस्यातून खुन केल्याची कबुली दिली. गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे तात्काळ फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला आणि नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउनि सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसेले यांनीही या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर