
अकोला, 25 एप्रिल (हिं.स.) : अकोला जिल्ह्यासाठी नाफेडकडून निश्चित करण्यात आलेला हरभरा खरेदीचा लक्षांक पूर्ण झाल्याने खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हरभरा उत्पादन झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल अजूनही घरात शिल्लक आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे लक्षांक वाढवण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधून राज्यातील हरभरा खरेदीचा लक्षांक वाढवण्याची मागणी केली.
यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच लक्षांक वाढवून खरेदी पुन्हा सुरू करण्याचे आश्वासनही संबंधित पातळीवर देण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार रणधीर सावरकर यांनी नाफेडच्या महाव्यवस्थापकांकडेही तातडीने लक्षांक वाढवून खरेदी सुरू करण्याची मागणी केली आहे. या हालचालींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे