अकोल्यात अत्याधुनिक रक्त घटक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन; रुग्णांना मिळणार वेळेवर उपचार
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा महिला रुग्णालय, अकोला येथे अत्याधुनिक रक्त घटक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले असून, यामुळे रुग्णांना आवश्यक रक्तघटक वेळेवर उपलब
अकोल्यात अत्याधुनिक रक्त घटक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन; रुग्णांना मिळणार वेळेवर उपचार


अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : जिल्हा महिला रुग्णालय, अकोला येथे अत्याधुनिक रक्त घटक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले असून, यामुळे रुग्णांना आवश्यक रक्तघटक वेळेवर उपलब्ध होणार आहेत.

नवीन केंद्रामध्ये पीसीव्ही (लाल रक्तपेशी), प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पीआरपी तसेच क्रायोप्रेसिपिटेट यांसारखे महत्त्वाचे रक्तघटक वेगळे करून गरजू रुग्णांना पुरवठा करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे विशेषतः माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील हे केंद्र जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे मोफत सेवा देणार आहे.

कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूराव पवार यांनी जिल्ह्यातील रक्तदान चळवळीतील स्वयंसेवी संस्थांना सहकार्याचे आवाहन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना पाटोकार, डॉ. राधा जोगी, डॉ. वाडेकर, डॉ. असलम, डॉ. नाईक, डॉ. करंजेकर, डॉ. शीतल पवार, डॉ. कुंदन चव्हाण, डॉ. सुनील जोशी आदी उपस्थित होते.

डॉ. आरती कुलवाल यांनी मार्गदर्शन करत आधुनिक तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेत वाढता वापर अधोरेखित केला. ‘किलकारी’सारख्या उपक्रमांद्वारे लाभार्थ्यांना मोबाईल संदेशाद्वारे माहिती दिली जाते, तसेच STEMI (हृदयविकाराचा गंभीर प्रकार) याचे निदान ईसीजीद्वारे करता येते, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्वही स्पष्ट केले. संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्ती आणि नियमित आरोग्य तपासणी यामुळे आजारांपासून बचाव होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. नव्या केंद्रामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळून जीव वाचण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या रॅली, गावपातळीवरील गटसभा आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आरोग्य विभागाने सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्ती तसेच शासकीय आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली. एचपीव्ही लसीकरण, ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियान आणि असंसर्गजन्य आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.

एकूणच, या उपक्रमांमुळे अकोला जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande