
मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.)
: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर येथे ३ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची दखल घेऊन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख याप्रमाणे एकूण ४५ लाख रूपये आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, रक्कम जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील सदस्य प्रवास करत असलेल्या वाहन विहिरीत पडल्याने हा अपघात घडला. मृतांमध्ये रेश्मा सुनील दरगुडे, आशा अनिल दरगुडे, खुशी (सृष्टी) अनिल दरगुडे, श्रेयस अनिल दरगुडे, राखी सुनील दरगुडे, श्रावणी अनिल दरगुडे, समृद्धी राजेंद्र दरगुडे, माधुरी अनिल दरगुडे व सुनील दत्तू दरगुडे यांचा समावेश आहे.
या प्रकरणी मृतांच्या वारसांची पडताळणी करून मंजूर मदत तातडीने वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश देण्यात आले आहेत.
गरजू नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबत अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी