
कोल्हापूर, 01 मे (हिं.स.)। देशात महाराष्ट्र अग्रेसर आहेच, यात काही शंका नाही. प्रगत महाराष्ट्राला राज्य शासनाच्या सहाय्याने आपण आरोग्यदृष्ट्या अधिक समृद्ध आणि संपन्न करणार आहोत, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील ११ डायलिसिस केंद्रे व ७ एम.आर.आय. केंद्रांना आजपासून प्रारंभ करण्यात आला असून, महाराष्ट्र दिनी या आरोग्य सेवांचे ऑनलाईन लोकार्पण आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने मंत्री सर्वश्री नितेश राणे,प्रताप सरनाईक,अतुल सावे, मकरंद पाटील,आशिष जयस्वाल व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्यासह खासदार प्रशांत बडोले, खासदार अनिल बोंद्रे, आमदार सर्वश्री नरेंद्र भोंडेकर,बालाजी कल्याणकर,संजय गायकवाड,किसनराव कथोरे,समाधान अवताडे, मनोज कायंदे,श्रीमती नमिता मुंदडा व सुलभा खोडके,प्रधान सचिव डॉ.निपुण विनायक, आयुक्त रवींद्रन सचिव डॉ.कादंबरी बलकवडे, संचालक मुंबई डॉ.अंबर्डेकर,संचालक पुणे डॉ.कंदेवाड,सह संचालक मुंबई डॉ. गोलाईत आदी उपस्थित होते. तर आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात व डॉ. हर्षला वेदक यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, तसेच खासगी क्षेत्रातील उच्च दर्जाच्या परंतु अत्यंत महागड्या आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला शासकीय आरोग्य संस्थांमार्फत मोफत मिळावा, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भविष्यात पैसे व परिस्थितीअभावी एकही रुग्ण उपचारांपासून वंचित राहणार नाही याची ग्वाही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिली.
संपूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर (ग्रामीण रुग्णालय मुरगुड), यवतमाळ (उपजिल्हा रुग्णालय दारव्हा), बीड (उपजिल्हा रुग्णालय केज), नाशिक (ग्रामीण रुग्णालय इगतपुरी), जळगाव (ग्रामीण रुग्णालय रावेर), सोलापूर (ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा), सातारा (ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी), सिंधुदुर्ग (उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला), ठाणे (ग्रामीण रुग्णालय बदलापूर), गडचिरोली (उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा) व रत्नागिरी (उपजिल्हा रुग्णालय दापोली) या ११ आरोग्य संस्थांमध्ये डायलिसिस सेंटर्स, तर जिल्हा रुग्णालय भंडारा, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, धाराशिव व परभणी या ७ आरोग्य संस्थांमध्ये एम.आर.आय. सेंटरची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील व सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी तसेच नगराध्यक्ष दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar