
रायगड, 01 मे (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी कामगार कल्याण, स्थानिक रोजगार आणि चांगल्या जीवनमानावर आधारित नवे धोरण जाहीर केले. “कंपनीची प्रगती आता फक्त प्रकल्पांवर नाही, तर लोकांच्या जीवनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर मोजली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी, भागीदार आणि कंत्राटदारांशी संवाद साधताना गौतम अदाणी यांनी सांगितले की, अदाणी समूह देशातील २४ राज्यांमध्ये ७०० हून अधिक ठिकाणी कार्यरत असून सुमारे ४ लाख कर्मचारी, भागीदार आणि कंत्राटदारांसोबत काम करत आहे. कंपनीचे उद्दिष्ट केवळ प्रकल्प पूर्ण करणे नसून रोजगारनिर्मिती आणि समाज सशक्तीकरणालाही प्राधान्य देणे आहे.
“आपण एखादा प्रकल्प पूर्ण करतो, तेव्हा केवळ बांधकाम करत नाही, तर देशाचे भविष्य घडवत असतो,” असे सांगत त्यांनी स्थानिक रोजगाराला विशेष महत्त्व दिले. प्रकल्प परिसरातील स्थानिकांना प्रथम रोजगाराची संधी दिली जाईल, त्यानंतर राज्यातील इतर भागांतील नागरिकांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी समूहाकडून मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जात आहेत. मुंद्रा आणि खावडा येथे सुमारे ५० हजार कामगारांसाठी वातानुकूलित निवास व्यवस्था तयार करण्यात येत आहे. तसेच मुंद्रा येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्लाउड किचनमधून दररोज जवळपास १ लाख लोकांसाठी पौष्टिक भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
“ही कोणती लक्झरी सुविधा नसून प्रत्येक कामगाराचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे,” असे गौतम अदाणी यांनी ठामपणे सांगितले.
अदाणी समूहाच्या या घोषणेमुळे कामगार कल्याण आणि स्थानिक रोजगाराला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)